जळगाव : मुलाला भेटून पुण्यावरून परतणाऱ्या जळगाव येथील दाम्पत्याच्या आनंदावर काळाने घाला घातला. अजिंठा घाटाच्या पायथ्याशी ट्रेलरने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मिताली सुहास पाटील (५८, रा. विनोबानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी सुहास राजाराम पाटील (६०) आणि चालक योगेश नारायण बारी (३५, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटील दाम्पत्य व चालक बारी हे कारने (एमएच ०३ एडब्ल्यू २६६१) पुणे येथे मुलाला भेटण्यासाठी गेले होते. भेट आटोपून ते जळगावकडे परतत असताना ही दुर्घटना घडली. अजिंठा घाट उतरल्यानंतर मागून येणाऱ्या ट्रेलरचा (एमएच २१ बीवाय ४९१६) चालकाचा ताबा सुटला आणि ट्रेलर थेट कारवर जाऊन आदळला. त्यामुळे कार ट्रेलरखाली दाबली जाऊन चक्काचूर झाली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून जळगाव येथे आणण्यात आले. मात्र, त्यापैकी मिताली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. पती व चालक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.