मुंबई – निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार, ईव्हीएम/व्हीव्हीपॅटची शेवटून दूसरी फेरी टपाल मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच सुरू केली जाणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी, तर सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएमची मोजणी सुरू होते. यापूर्वीच्या पद्धतीनुसार दोन्ही प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहू शकत होत्या, त्यामुळे काही वेळा ईव्हीएमची मोजणी आधी पूर्ण होत असल्याने गोंधळ निर्माण होत असे.
अलीकडेच दिव्यांग मतदार व ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे टपाली मतपत्रिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रक्रियेत सुसंगती राखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
तसेच, ज्या मतदारसंघांमध्ये टपाली मतपत्रिकांची संख्या अधिक आहे, तिथे पुरेशी मोजणी टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयोगाने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मतमोजणीची गती आणि पारदर्शकता कायम राहील, असे आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.





