मुंबई – राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. या वेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदार यादीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले.
“मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा बदल करणे हा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत नाही,” असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाची यादीच वापरली जाणार असून, १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली यादीच लागू राहील.
प्रभागनिहाय यादी तयार करताना नाव किंवा पत्त्यांमध्ये चुका झाल्यास मतदारांना हरकती व सूचना नोंदविण्याचा अधिकार असेल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, प्रमुख प्रचारकांची मर्यादा २० वरून ४० करण्याचा आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याचा विचार आयोग करणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.





