नाशिक – नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! ही टॅगलाईन आज उभ्या महाराष्ट्रभर गाजत आहे. नाशिक शहरात ज्या पद्धतीने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत, तो प्रकार सामान्य नागरिकांसाठी ‘ काबिले तारीफ ‘ आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत खुनामागे खून, खुनांची मालिका, वाहनांची तोडफोड, अंमली पदार्थांचा खुला वापर, गुन्हेगार व गुन्हेगारीचे खुले समर्थन करणारे रॅपचे रिल्स, गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणारे बॅनर्स यासर्व गोष्टीं अक्षरशः उतू जायला लागल्या होता. हे देवभुमी – यंत्रभूमीचे नाशिक आहे, की आफ्रिकेतील एखादे बेलगाम शहर आहे? असा प्रश्न निर्माण झाला होता. हाईट म्हणजे तरुण मुलींचेही गुन्हेगारी ग्लोरिफाय करणारे रॅम्प टाईप व्हिडिओ देखील व्हायरल व्हायला लागले होते. अतिरेक तर तेव्हा झाला जेव्हा ” नाशिक जिल्हा – गुन्हेगारीचा बालेकिल्ला ” अशा स्लोगन घेवून व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले होते. खुनासारख्या बऱ्याचशा गंभीर गुन्ह्यातील गुंडांनी नेहमी प्रमाणे सत्ताधारी पक्षात प्रवेश करून राजकीय प्रोटेक्शन दाखविण्याचा प्रयत्न केला होता. येत्या सिंहस्थाच्या पार्श्वभुमीवर ही गंभीर स्थिती अधिक गंभीर होत हाताबाहेर जाईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांच्या पर्यंत हे सर्व रिपोर्ट जात होते. नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. मुख्यमंत्र्यांनीही कुठलाही पक्ष, नेता, पुढारी, राजकारण वगैरे न पाहता सरसकट ही अति वाढलेली गुन्हेगारी मोडून काढा, अशी खुली छुट पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यांनी तशी प्रतिक्रियाही माध्यमातून दिली. त्यानंतर पोलिस आयुक्त संदीप कार्णिक, अपर पोलिस आयुक्त किशोर काळे, मोनिका राऊत वगैरे अधिकाऱ्यांचे टीमवर्क सुरू झाले. रस्त्यावर छेडखानी करणाऱ्या रोमियोंना धडा शिकविण्यापासून सुरुवात झाली. गुन्हेगारांचे महिमा मंडन करणाऱ्या बॅनरवर कारवाई सुरु झाली. नाशिककर सुखावले. त्यानंतर धमकावणीचे – दहशत निर्माण करणारे रॅम्प रिल्स बनविणाऱ्यांची धुलाई आणि धिंड सुरु झाल्या. “नाशिक जिल्हा – गुन्हेगारीचा बालेकिल्ला ” अशा रिल्स बनविणारे गुंड बांधलेल्या स्थितीत लंगडत – लंगडत धिंडीत चालताना ” नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला ” अशा घोषणा देतानाचे रिल्स व्हिडिओ पाहून दहशतीत वावरणाऱ्या नाशिककरांना सुरक्षित वाटू लागले. नाशिककर संदीप कर्णिकांना दबंग अधिकारी – सिंघम म्हणू लागले. त्यांनी एका मुलाखतीत नम्रपणे मला दबंग सिंघम म्हणू नका, मी जनसेवक आहे, अशी नम्र प्रतिक्रिया दिली.
नाशिक – धुळे – जळगाव व आता सर्व मोठ्या शहरात गुंडांकडून दहशत करून मोठमोठ्या बंगल्यांचा जबरीने ताबा करण्याचा धंदा सुरु झाला आहे. नंतर दोन – पाच कोटीपर्यंत तोडीपानी करून हा ताबा सोडला जातो. हा धंदा खूप फोफावला आहे. नाशिकमध्ये लोंढे नावाच्या गुंडाने असाच ‘ पुष्कर ‘ नावाचा बंगला बळकावला होता. दोन कोटीची तोडी मागत होता. या मोहिमेत पोलिसांनी त्याला हुसकावून तो बंगला सील केला. मर्डरचे किती तरी आरोपी – मोठमोठे राजकीय कनेक्शनचे आरोपी सप्तश्रृंगी गड व ठिकठिकाणाहून जेरबंद केले. पोलिसांनी उचललेल्या बड्या आरोपींपैकी बहुतेक तर सत्ताधारी भाजपाचेच लेबल लावून फिरत होते. मात्र कोण गुन्हेगार कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता त्यांना उचलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना खुली सुट दिल्याने हे शक्य झाले आहे. स्थानिक सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचे समर्थन ही देखील विशेष बाब आहे.
खरे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अशीच खुली छुट धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे व अन्य जिल्ह्यातही द्यायला हवी आहे. या भागातही गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या रिल्स, बॅनर्स चा अधुन मधुन धमाका सुरु असतो. धुळ्यात चिन्मय पंडित हे जिल्हा पोलिस अधीक्षक होते. तेव्हाचा प्रकार आहे. धुळे शहरातील एक प्रख्यात राजकीय आश्रयप्राप्त पैलवान, गंभीर गुन्ह्यांतील आरोपीने त्याच्या वाढदिवसाचे प्रचंड प्रमाणात संपूर्ण शहर भरून टाकणारे बॅनर व होर्डिंग लावले होते. गंभीर बाब म्हणजे शहरभरच्या बहुतेक व्यावसायिक होडिंग्जवर परस्पर दादागिरीत हे बॅनर त्यांची कुठलीही परवानगी न घेता लावले होते. या बाबत बऱ्याच तक्रारी आल्या. आम्ही स्वतः सर्वांना घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांची भेट घेतली. निवेदन दिले. अर्थात त्यांनीही सकाळी तो प्रकार पाहिलेला होता. आम्ही कारवाईची मागणी केली. ते म्हणाले, ” मी स्वतःच करतो कारवाई, चला माझ्या सोबत! ” त्यांनी कॉजवे पुलाजवळ सगळे पीआय बोलावले. स्वतः बांबू हातात घेतला व पैलवानाचे बॅनर फाडून काढले. सर्व पोस्टेना त्यांच्या त्यांच्या हद्दीतले गुंडांचे बॅनर काढून गुन्हे दाखल करावयाचे आदेश दिले होते. मागील जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड व मनपा कर उपायुक्त पत्लवी शिरसाठ वगैरे अधिकाऱ्यां सोबत या विषयावर झालेल्या बहुतेक बैठकात आम्हीच ‘ गुंडांचे बॅनर लावू देवू नका ‘ म्हणून सुचना मांडल्या आहेत. याचे कारणही त्यांना सांगितले आहे. बॅनरवर झिपरे – झापरे, भितीदायक, सोन्याचे गोफ घातलेले, सोफ्यावर पसरून बसलेले फोटो, ‘शेर की झलक सबसे अलग ‘ या टाईपच्या दहशत निर्माण करणाऱ्या घोषणा. हे सर्व दहशतीचे मार्केटिंग असते. ही बाब त्या – त्या वेळीच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेली आहे. अर्थात चिन्मय पंडित, संदीप कर्णिक सारखे अधिकारी असले तर त्याचा उपयोगही होतो.
बऱ्याचदा गुंड कारागृहातून सुटल्यावर विजयी मिरवणूक काढतात. चौकात बर्थ डे केक तलवारीने कापतात. त्यावर सर्वत्र आता पोलिस कारवाई होते. ही समाधानाची बाब आहे. एक काळ असा होता, मुक्ताईनगरमधील केंद्रिय मंत्र्यांच्या मुली मैत्रिणींची यात्रेत छेड काढायला रोमिओ कमी करत नसत. मोनिका राउतांनी धुळ्यात असताना याबाबत चांगले काम केले होते. यात दुसरा भाग असा, की बऱ्याच वेळा पोलिस स्टेशनच्या रुममधून निघताना अगदी व्यवस्थित चालणारा आरोपी त्याच्या कानात साहेबांनी काही सांगितल्यावर धिंड मध्ये लंगडत – लंगडत चालतो, असेही व्हिडिओ येतात. त्यात अभिनय नसावा. ती मात्र काळजी घेतली पाहिजे. खरे म्हणजे मानवाधिकार वाल्यांचा धिंड काढण्यास आक्षेप असतो.परंतु तपास कामात आरोपीला घटना स्थळी नेताना जीप खराब झाली, अन्य वाहन उपलब्ध झाले नाही, म्हणून पायी न्यावे लागले, असे कारण दर्शवून पोलिसांना खानापुर्ती करता येते. अर्थात आता वस्तीभर दहशत माजविणारे गुंड जेव्हा रांगेने दोरखंडात बांधून लंगडत चालत ‘ नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला !’ म्हणून घोषणा देतात, तेव्हा सामान्य पापभिरु नागरिक, महिला, भागिनी, तरुणी यांना किती सुरक्षित वाटत असेल, याची आपण कल्पना करू शकतो. जो प्रयोग नाशिकमध्ये होत आहे, तो प्रयोग देवाभाऊंनी उभ्या महाराष्ट्रात राबवायला काय हरकत आहे!





