साकळी (ता. यावल) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान–२०२५ अंतर्गत साकळी ग्रामपंचायतीकडून ‘स्वच्छ ग्राम, सुंदर ग्राम’ हा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेत दररोज किमान एक ग्रामविकासाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, विशेष भर गावातील स्वच्छतेवर देण्यात आला आहे.
ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकू नयेत म्हणून सरपंच दिपक नागो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक करण्यासाठी सरपंच स्वतःही सफाई मोहिमेत झाडू आणि फाकडा हाती घेऊन सहभागी झाले. त्यांच्या या कृतीकडे ग्रामस्थांनी लक्ष देत कौतुकाचा वर्षाव केला.
“ग्रामस्वच्छतेतच गावाची खरी सुंदरता आहे” — या ध्येयातून ग्रामपंचायत, सफाई कर्मचारी, सदस्य, अधिकारी पी. आर. धनगर तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि बाजारपेठेत टप्प्याटप्प्याने स्वच्छता करण्यात आली.
दर सोमवारी ‘स्वच्छता वार’ म्हणून साजरा करण्याचे नियोजन ग्रामपंचायतीने केले असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर रु.१५०० दंड आकारला जाणार आहे. तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, यामुळे स्वच्छतेबाबत ग्रामस्थांचा सहभाग अधिक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





