विवरा (ता. रावेर) – विवरा ते खिर्डी या सुमारे ४ किलोमीटर अंतरावरील मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र पहिल्याच पावसात संपूर्ण रस्ता वाहून गेला आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे, फुटलेले डांबर आणि साईड पट्ट्यांचा पूर्ण अभाव असल्याने वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून दररोज केळीने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर आणि दुचाकी वाहनं मोठ्या प्रमाणावर धावत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता कायम निर्माण होते.
स्थानिक नागरिक सांगतात, “पावसाळ्यात तर परिस्थिती इतकी बिकट होते की पायी चालणेही कठीण होते. अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा आम्ही देऊ.”
या रस्त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे, तर विद्यार्थी आणि कामगारवर्गालाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी या समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन विवरा–खिर्डी रस्त्याचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.





