रावेर : निंभोरा पोलिस स्टेशनचे हवालदार सुरेश पवार हे २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) सापळ्यात अडकले असून या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदारांनी शेतकऱ्याकडून १ लाख २७ हजार रुपयांचा केळीचा माल खरेदी करून दिल्लीतील व्यापाऱ्यांना विकला होता. परंतु शेतकऱ्यांना पैसे न दिल्याने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तक्रारदारांना निंभोरा पोलिस स्टेशनवर बोलावण्यात आले.
यावेळी हवालदार सुरेश पवार यांनी तक्रार अर्जात नमूद रकमेच्या १० टक्के प्रमाणे लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी एसीबीकडे केली. तक्रारीनंतर एसीबीने त्याच दिवशी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणीत हवालदार पवार यांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हा नोंद न करण्यासाठी आणि चौकशीत “योग्य ती मदत” करण्याच्या मोबदल्यात २०,००० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोहेकॉ किशोर महाजन, मपोहेकॉ संगीता पवार, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी आणि पोकॉ भूषण पाटील यांच्या संयुक्त पथकाने केली.





